काही कविता मनातच अंकुरतात, मनातच फुलतात आणि मनात कायमच्या घर करून राहतात. अशाच काही मनात उमललेल्या कविता.


शरद ॠतु

माथ्यावरती इंद्रधनूची वेणी बांधीयली,
दिव्यतनूवर हिरवाईची शालही पांघरली,
खुलून दिसते मुखड्यावरती पश्चिमेची लाली,
स्वागत करण्या शरद ॠतुचे सृष्टी ही सजली. ॥१॥

बनुनी पैंजण, करती रुणझुण, निर्झर अन् नाले,
त्या तालावर काठावरती रानलता जणू डोले,
आनंदाने फुलून गेल्या रानफुलांच्या वेली,
स्वागत करण्या शरद ॠतुचे सृष्टी ही सजली. ॥२॥

गोड गारवा घेऊन वाहे पवन मंद मंद,
चराचरातुन भरून वाहे अवघा मृद्गंध,
अंबरभाळी चंद्रकोरीची बींदी अशी लावली,
स्वागत करण्या शरद ॠतुचे सृष्टी ही सजली. ॥३॥

केशर घालूनी सडा शिंपला पूर्व दिशेला कोणी,
क्षितिजावरती पहा तेवते शुक्राची चांदणी,
प्रभा पसरता दिनकराची तीही किती लाजली,
स्वागत करण्या शरद ॠतुचे सृष्टी ही सजली. ॥४॥

शेत वावरां मधून पसरे सुखद एक गंध,
पात्यांवरती कणसे, लोंब्या डोलती होउन धुंद,
धरा भिजवूनी शीतल करण्या वर्षेची सर आली,
स्वागत करण्या शरद ॠतुचे सृष्टी ही सजली. ॥५॥

कुरळ्या कुरळ्या केसांसम ते मेघ नभी शोभती,
करा भास्कराचा तो शोभे प्रभात समयी हाती.
उन कोवळे पडता तनुवर अवनी सुखावली,
स्वागत करण्या शरद ॠतुचे सृष्टी ही सजली. ॥६॥
कांचन ओझे लिखित ह्या गीताला संगीत देऊन गायले आहे माधवी पोतदार यांनी. 
हे गीत बकुल पंडित यांनी गायलेले असून त्याला चाल सुद्धा त्यांनीच लावलेली आहे.

श्रीकृष्णाच्या बाललीलांवर कांचन ओझे रचित काव्यरूपात एक कथा. श्रीकृष्णाने एका गवळणीला दाखविलेल्या आपल्या लीला,

Pages: 1 2